विविध मागण्यांसाठी आशा वर्कर व गटप्रवर्तकांचे जेलभरो संपाचा तेरावा दिवस

0

सुपरफास्ट बातमी
अहमदनगर( वाजिद शेख )३१.१०.२०२३
मागील 13 दिवसापासून सुरु असलेल्या संपाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील आशा वर्कर व गट प्रवर्तकांनी सोमवारी (दि.30 ऑक्टोबर) जिल्हा परिषदेवर मोर्चाने येऊन धरणे व जेलभरो आंदोलन केले. तर आशा सेविकांना कामावर हजर होण्यासाठी बजाविण्यात आलेल्या नोटिसांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर होळी करण्यात आली. आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने (महाराष्ट्र राज्य) आंदोलन करण्यात आले होते.

दबाव तंत्राने बळजबरीने करुन घेतले जाणारे ऑनलाईनचे काम बंद होण्यासाठी जिल्ह्यातील 3200 आशा सेविका व 190 गट प्रवर्तक संपावर आहे. संप पुकारुन देखील प्रलंबीत मागण्यांकडे लक्ष न देता नोटीस बजावल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आयटकचे राष्ट्रीय सदस्य कॉ. ॲड. सुधीर टोकेकर, संघटनेच्या अध्यक्षा सुवर्णा थोरात, मार्गदर्शक कारभारी उगले, जिल्हा संघटक कॉ. सुरेश पानसरे, उषा अडागले, शोभा गायकवाड, कविता गिरे, शारदा काळे, वर्षा चव्हाण, सुप्रिया जाधव, स्मिता ठोंबरे, कोल्हार शेजुळ, जयश्री गुरव, अश्‍विनी गोसावी, सविता धापटकर, सुनीता साळवे, धामणे सुनीता, नसरीन पठाण, स्वाती इंगळे, वैशाली वाळूंज, वैजंती गायकवाड, रेखा अवसरे, लक्ष्मी भांगरे, रुपाली सोनवणे, सविता शिंदे, शोभा इंगोले, व्ही.बी. त्रिभुवन, आशा गुलदगड, प्रमिला गव्हाणे, लक्ष्मी कुलट, गौरी पवार, अमृता कचवे, झाडे शोभा, रुपाली हुसाळे, वंदना रोकडे, त्रिभुवन, अंबिका भालेराव आदींसह जिल्ह्यातील आशा वर्कर व गट प्रवर्तक मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

बुरुडगाव येथील भाकपच्या कार्यालया पासून मोर्चाची सुरुवात झाली. जिल्हा परिषदेवर मोर्चा धडकला असता यावेळी जोरदार निदर्शने करण्यात आली. संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना अटक करुन कोतवाली पोलीस स्टेशनला आणण्यात आले. काही वेळानंतर त्यांना सोडण्यात आले. कॉ. ॲड. सुधीर टोकेकर म्हणाले की, आरोग्य अधिकारी आशा सेविकांना नोटीस बजावून कामावर हजर होण्यास सांगत आहे. कामावर हजर न झाल्यास मानधन रोखून कार्यवाही करण्याचा इशारा देण्यात आला आहे. संप कायदेशीर असून, नियमाने अगोदर नोटीस देऊन करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.


कॉ. सुरेश पानसरे म्हणाले की, प्रधानमंत्री यांच्या शिर्डी येथील कार्यक्रमात आशा सेविकेला गुपचूप पणे स्टेजवर बोलवून बोनस कार्ड देण्यात आले. मात्र त्यांना किमान वेतन व त्यांचे न्याय हक्क मिळण्याची गरज आहे. शासनाला जागे करण्यासाठी हा संप सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुवर्णा थोरात यांनी आशा सेविका व गट प्रवर्तकांच्या न्याय मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत हा संप सुरू राहणार आहे. शासनाने दखल न घेतल्यास कोणत्याही कारवाईला न घाबरता आंदोलन तीव्र केले जाणार असल्याचा इशारा दिला.

आशा वर्कर यांना आयुष्यमान भारत व गोल्डन कार्ड बाबतचे काम बळजबरीने करुन घेतले जात आहे. आशा वर्कर या कमी शिकलेल्या असून, त्यांना इंग्रजीचे पुरेसे ज्ञान नाही. आयुष्यमान भारत व गोल्डन कार्ड संबंधित इंग्रजी मध्ये ऑनलाईन माहिती भरणे अत्यंत किचकट व अवघड असून, हे काम बळजबरीने काम करून घेतले जात असल्याचा संघटनेचा आरोप आहे.


आशा वर्कर यांना ऑनलाईनची कामे देऊ नये, गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचारीचा दर्जा देऊन शासकीय वेतन श्रेणी भत्ते लागू करावे, जोपर्यंत शासकीय कर्मचारीचा दर्जा मिळत नाही तोपर्यंत त्यांना कंत्राटी कर्मचारी (एनएचएम) प्रमाणे वेतनश्रेणी द्यावी, कंत्राटी कर्मचारी यांना लागू असलेली वार्षिक वेतन वाढ 5 टक्के व बोनस 15 टक्के गटप्रवर्तक यांना देऊन त्यांना सुट्ट्या लागू कराव्या, प्रवास भक्ता वेगळा द्यावा, गटप्रवर्तकांचे नाव बदलून आशा सुपरवायझर करावे, गटप्रवर्तकांना विना मोबाईल ऑनलाईन कामे सांगण्यात येऊ नये, आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना दिवाळी भेट द्यावी, आशा सेविका व गटप्रवर्तक यांच्या मोबदल्यात वाढ मिळवून द्यावी, आशांना किमान वेतन लागू करावे, अशा वर्कर यांना सन्मानाची वागणूक देऊन त्यांच्यावर दबाव आणि बळजबरीने कामे करुन घेण्याचा प्रकार थांबवावा, आशांना दरमहा वेतन द्यावे व प्रत्येक महिन्याला त्याची पगार स्लिप देण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन आमदार संग्राम जगताप व जिल्हा परिषदचे आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांना देण्यात आले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)