सुपरफास्ट बातमी
प्रतिनिधी ( राजस्थान )१७.११.२०२३
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. कोरोना काळात देशभरात मृत्यूचे तांडव सुरू असताना दुसरीकडे पंतप्रधान मोदी हे थाळी वाजवण्यास व मोबाईल टॉर्च लावण्यास सांगत होते. अशी टीका राहुल गांधी यांनी केली. पंतप्रधान मोदी हे भांडवलदारांसाठी काम करत असल्याची बोचरी टिका ही राहुल गांधी यांनी केली आहे.
राजस्थानमधील चुरू येथील एका सभेत संबोधित करताना राहुल गांधी यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे. राहुल यांनी म्हणतात की, आमचे सरकार गरिबांसाठी काम करते. आम्ही सामान्य लोकांचे संरक्षण करतो. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी जीएसटी लागू केली आणि आता देशातील शेतकऱ्यांना कर भरावा लागत आहे. त्यांनी नोटबंदी केली आणि छोटे व्यापारी, उद्योजकांना उद्धवस्त केले.
काँग्रेसचे सरकार गरिबांसाठी काम करतंय
राहुल गांधी जाहीर सभेत म्हणाले की, आज लोक पंतप्रधान मोदींच्या आश्वासनांवर लागले आहेत. १५ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. लोकांना ते मिळाले का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मोदींचा हमीभाव म्हणजे अदानीचा हमीभाव आणि काँग्रेसचे सरकार म्हणजे शेतकरी आणि मजुरांचे सरकार असल्याचेही राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले.
तुम्हाला अदानींचे सरकार पाहिजे की शेतकरी, मजूर आणि तरुणांचे सरकार हवे? असा थेट प्रश्न राहुल यांनी जाहिर सभेत असणाऱ्यांना लोकांना केला. राजस्थान सरकारने लोकांसाठी खूप काम केले असून भाजपचे सरकार सत्तेवर आल्यास आम्ही ज्या योजना राबवल्या त्या रद्द करतील आणि अब्जाधीशांसाठी काम करतील, असा दावा राहुल गांधी यांनी यावेळी केला.
पंतप्रधान मोदी भांडवलदारांसाठी काम करत आहेत
राहुल यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी आणि अदानी यांच्यात साटंलोटं असल्याचा आरोप करत भाषण केले. जिकडे पाहावे तिकडे अदानी काही ना काही धंदा करत आहे. विमानतळ, बंदरे, सिमेंट प्लांट, रस्ते सर्व त्याच्या मालकीचे आहेत. ते पंतप्रधान मोदी भांडवलदारांसाठी काम करतात. ते अदानीला मदत करतात, अदानी पैसे कमवतात आणि तो पैसा परदेशात वापरला जातो, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलनाला काँग्रेसची साथ
कृषी कायद्याबाबत राहुल गांधी म्हणाले, पीएम मोदींनी कृषी कायदा आणला आणि त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल, असे सांगितले. पण त्याविरोधात देशातील सर्व शेतकऱ्यांनी धरणे-आंदोलन केले. हा कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा नसून अदानी-अंबानी यांच्या हिताचा असल्याचे सांगितले. काँग्रेसनेदेखील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला साथ दिली आणि हा काळा कायदा हाणून पाडला असल्याचे राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले.