प्रतिनिधी ( नागपूर )२०.११.२०२३
जालना येथील अंबड येथे झालेल्या ओबीसी एल्गार सभेत राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर खालच्या पातळीवर टिका केली होती. यावरुन ओबीसी आणि मराठा वाद निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या एल्गार सभेत सहभागी झालेले विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी भुजबळ यांच्या दोन समाजात तेढ निर्माण होणाऱ्या वक्तव्यांना आपला पाठींबा नसल्याचे जाहीर केले आहे. सत्तेत राहून समस्या सोडवायच्या असतात, जर ते सत्तेत राहून ते समस्या मांडीत असतील तर सत्तेत का राहता ? असा सवालही त्यांनी यावेळी मंत्री छगन भुजबळ यांना उपस्थित केला.
नेमक काय म्हणाले विजय वडेट्टीवार ?
समाजाची बाजू मांडताना कोणीही टोकाची भूमिका मांडू नये. गावा-गावात वाद झाले भांडण झाले तर कोण जबाबदार असेल? शाहू फुले आंबेडकरांचा आपला महाराष्ट्र आहे, मी आणि माझा पक्ष शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी सभेत ज्या पद्धतीने टोकाचे विधान केले त्याला माझे समर्थन नाही.
सरकारकडून अनेकांना प्रमाणपत्र देऊन झाले आहेत.
सत्तेत असताना समस्या सोडवल्या पाहिजे. सत्तेत असून ओबीसी समाजाच्या समस्या सोडवता येत नसतील तर त्यांनी सत्ता सोडली पाहिजे.
ज्याप्रकारे छगन भुजबळ टोकाची भूमिका घेत आहेत ते पाहता मी यापुढे भुजबळांच्या कोणत्याही मंचावर जाणार नसल्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. भुजबळांच्या भूमिकेमुळे दोन समाजात तेढ निर्माण होत आहे. त्याला आमचा विरोध आहे. महत्वाचं म्हणजे भुजबळांचं मत म्हणजे समाजाची भूमिका होत नाही असंही वडेट्टीवार यावेळी म्हणाले.