प्रतिनिधी ( नेवासा ) ०९.१२.२०२३
नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा मंडळातील अनेक गावांना सन २०२२ या वर्षातील अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळाली आहे. पण वडाळा बहिरोबा गावातील शेतकरी बांधवांना अतिवृष्टीची भरपाई अद्याप मिळालेली नाही. दि. १९ डिसेंबर २०२३ पर्यंत शासनाने अतिवृष्टीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी तसेच रेशनकार्ड संदर्भातील प्रश्न तातडीने सोडवावेत अन्यथा आमरण उपोषणासह तीव्र आंदोलन छेडले जाईल असा ईशारा सामाजिक कार्यकर्ते जयवंत मोटे यांनी निवेदनाद्धारे दिला आहे.
दिलेल्या निवेदनात जयवंत मोटे यांनी म्हटले आहे की वडाळा गावातील नागरिकांना नविन, विभक्त, दुबार, शिधापत्रिका ऑनलाईन, आदी प्रक्रिया लवकर पुर्ण होत नाही. दवाखान्यात उपचारासाठी, शिक्षणासाठी रहीवाशी पुराव्यासाठी व इतर कामासाठी शिधापत्रिकेची आवश्यकता असते. तसेच नागरिकांना शिधापत्रिकेच्या आदी कामासाठी नुसते हेलपाटे मारावे लागत आहे. तसेच तहसीलदार साहेब यांनी वडाळा बहिरोबा गावातील शेतकरी बांधवांचे अतिवृष्टी व शिधापत्रिका धारकांचे प्रश्न लवकर सोडवावेत अन्यथा २१ डिसेंबर पासून नेवासा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा जयवंत लक्ष्मण मोटे यांनी दिला आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अतिवृष्टीची नुकसान भरपाई व वडाळा बहिरोबा गावातील नागरिकांचे शिधापत्रिकाचे प्रश्र सुटत नाही. तो पर्यंत जयवंत मोटे आमरण उपोषण सोडणार नाही.
अशी माहिती निवेदनाद्वारे पोलिस निरीक्षक शनिशिंगणापूर, पोलिस निरीक्षक नेवासा, पोलीस अधिक्षक कार्यालय अहमदनगर व जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर यांना देण्यात आले आहे.